राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्याही ९ जागा होणार रिक्त...

Foto
मुंबई : राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक पार पडणार आहे. या ७ जागांपैकी ६ जागांवर महायुती तर एका जागेवर महाविकास आघाडी निवडून येण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वाधिक ४ जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहेत. तर शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळेल. दुसरीकडे महाविकास आघाडीत एका जागेवरून चढाओढ दिसून येते. उद्धवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एका जागेवरून खलबतं सुरू आहेत. मात्र राज्यसभा निवडणुकीनंतर लगेच मे महिन्यात विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे या विधान परिषदेची गणितेही राज्यसभा निवडणुकीत जुळवण्याचा मविआतील घटक पक्षांचा प्रयत्न आहे.

'हे' ९ सदस्य १३ मे २०२६ रोजी होणार निवृत्त

उद्धव ठाकरे - शिवसेना
नीलम गोऱ्हे - शिवसेना 
अमोल मिटकरी - राष्ट्रवादी
शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी
राजेश राठोड - काँग्रेस
प्रवीण दटके - भाजपा
गोपीचंद पडळकर - भाजपा
रणजितसिंह मोहिते पाटील - भाजपा
रमेश कराड - भाजपा

गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी भाजपात इतरांना संधी मिळू शकते. त्याशिवाय रणजितसिंह मोहिते पाटील यांचे सध्या पक्षात फारसे चांगले संबंध नाहीत. त्यामुळे त्यांनाही पुन्हा भाजपाकडून संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. विधान परिषदेच्या ९ जागांमध्ये उद्धव ठाकरे यांचीही जागा रिक्त होणार आहे. त्यामुळे ठाकरे पुन्हा विधान परिषदेत दिसणार का याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. परंतु आदित्य ठाकरे यांच्याकडून पक्षाला एका विधान परिषदेच्या जागेचा आग्रह धरण्यात येत आहे. 

विधानसभेतील संख्याबळ पाहता विधान परिषदेच्या ९ जागांवर मोजक्याच जागा विरोधकांच्या वाट्याला येणार आहेत. तर भाजपा-शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील संख्याबळ वाढण्याची शक्यता आहे. सध्या विधानसभेत भाजपा १३२, शिंदेसेना ५७, अजित पवारांची राष्ट्रवादी ४०, उद्धवसेना २०, काँग्रेस १६, शरद पवारांची राष्ट्रवादी १०, सपा २, जनसुराज्य २, युवा स्वाभिमान १, राष्ट्रीय समाज पक्ष १, एमआयएम १, सीपीआय १ असे पक्षीय संख्याबळ आहे.